मुंबईतील महानगरपालिका रुग्णालये अद्याप अस्वच्छच

hospital
मुंबई – एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाला सुरूवात केली असता दुसरीकडे मात्र मुंबईतील महानगरपालिकांच्या रुग्णालयात मात्र अस्वच्छेचे वातावरण पाहायला मिळत आहे. पालिका रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून सफाई कामगारांची एक हजार पदे रिक्त असल्यामुळे रुग्णाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेची केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर ही तीन मुख्य रुग्णालये, २० प्रसूतिगृह आणि उपनगरातील १८ रुग्णालये आहेत. यात एकूण ६०० सफाई कामगारांची पदे रिक्त आहेत.ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत. रुग्णालयामध्ये सफाई कामगारांची संख्या अपुरी असल्याने स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत आहे. १९९९ ते २००५ या काळात कामगारांची भरती बंद केली होती. अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ४०० जागा भरल्या गेलेल्या नाहीत. मात्र लाड समितीच्या शिफारशींनुसार पालिका प्रशासनाने घनकचरा खात्यातील सफाई कामगारांची भरती करण्यास सुरुवात केली. पण यामध्ये रुग्णालयामधील सफाई कामगारांची पदे भरण्यात आली नाहीत. त्याशिवाय इतर सर्व रुग्णालयांमधील सफाई कामगारांची ६०० पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्त्वावरील सुमारे चारशे व नेहमीच्या पदांवरील ६०० अशी सफाई कामगारांची सुमारे एक हजार पदे रिक्त असल्याचा दावा म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी केला. त्याशिवाय ३० टक्के बदली कामगारांची गरज आहे. याबाबत पालिका प्रशासनाबरोबर चर्चा झाल्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युनियनने केला आहे.