अमृतसर- भारत आणि पाकिस्तानच्या काश्मीर भागातील सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन यंदा ईद निमित्त भारत पाक वाघा बॉर्डरवर मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली नाही. दिवाळी, ईद आणि १५ ऑगस्ट या दिवशी या बॉर्डरवर भारत आणि पाकचे कमांडर एकमेकांना शुभेच्छा देऊन मिठाईची देवाणघेवाण करण्याची परंपरा बरच जुनी आहे आणि गेली कित्येक वर्षे ती पाळली जात आहे.
यंदा ईदच्या दिवशी मात्र पाकिस्तान कमांडरने भारतीय कमांडरकडून मिठाई स्वीकारली नाही. त्याचे कोणतेही कारण दिले गेले नसले तरी सीमेवरील वाढत्या तणावामुळे नकार दिला गेला असावा असे सांगितले जात आहे. सायंकाळी फ्लॅग मिटींगही झाली नाही व त्यामुळे वाघा बॉर्डरची भारत आणि पाक दोन्ही कडची गेट बंदच राहिली.वरील तीन दिवशी गार्डींग ट्रूपची ड्रील होते व दोन्ही बाजूचे सिनिअर कमंडर अधिकृत गणवेशात एकमेकांना मिठाई देतात. हा सोहळा पाहण्यासाठी सीमा भागातील नागरिक तसेच पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात असे समजते.