टेलिकॉम क्षेत्रात लवकरच ‘अच्छे दिन’ ४० लाख नोकर्‍यांची संधी

telecom
नवी दिल्ली – ग्रामीण भागील ग्राहकांची वाढणारी संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार या कारणांमुळे येत्या पाच वर्षांत देशातील टेलिकॉम क्षेत्रात ४० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात लवकरच ‘अच्छे दिन…’ येणार असल्याचे मानले जात आहे.

केंद्र सरकारने देशातील अडीच लाख गावांना हाय स्पीड ब्रॉडब्रॅण्डने जोडण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. अभियंते, कुशल तंत्रज्ञ यांच्याबरोबरच नव्याने जोडणी आणि देखभाल सेवा देण्यासाठी लागणारे कर्मचारी, विक्री, विपणन आणि मनुष्यबळ विभागासाठी लागणार्‍या कर्मचार्‍यांची मागणीत वाढ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. रॅंडइस्ट इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.उप्पालुरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन दशकांत टेलिकॉम क्षेत्रात वार्षिक ३५ टक्के दराने वाढ होत आहे. या क्षेत्राच्या भरभराटीचा काळ मागे सरला असला तरी हे क्षेत्र रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करत राहणार आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षात या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे ४० लाख नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागात मोबाइलचा वाढत असलेला प्रसार आणि मोबाइल व इंटरनेट ब्रॉडब्रॅण्डचा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment