वॉशिंग्टन – पाच दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतत असून त्यांच्या विशेष विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केले आहे. पाच दिवसातील शेवटचे दोन दिवस मोदी वॉशिंग्टनमध्ये राहिले. पहिल्या दिवशी डिनरसाठी तर दुस-या दिवशी बोलणीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांना भेटले. दोन्ही नेते व्यापार आणि संरक्षणासह अनेक मुद्द्यांवर मिळून काम करण्यास राजी झाले. मात्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ साठी संयुक्त अग्रलेख लिहून दोघांनीही सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारत-अमेरिकेची भागीदारी जगाला शांतता देत राहील, असे त्यात म्हटले आहे. त्यात विवेकानंद, गांधीजी, वाजपेयींपासून मार्टिन ल्यूथर किंग यांचा उल्लेख आहे. ‘साथ साथ’ चालण्याच्या आश्वासनाने त्याची सांगता करण्यात आली. ही ‘डिजिटल डिप्लोमसी’ची सुरुवात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधातील कारवाईत व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या शिखर चर्चेत अमेरिकेने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, भारताने दहशतवादी संघटना आयएसआयएसविरोधातील सैन्य कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे.