मुंबई – महाराष्ट्रात भाजपने स्वबळावर निवडणूक प्रचार मोहिम आखली असून सोमवारपासून ही मोहिम राज्यभर एकाचवेळी सुरू केली जात आहे.मुलुखमैदान कँपेन अशा नावाने चालविल्या जाणार्या या मोहिमेत भाजपतील अनेक वरीष्ठ नेते, केंद्रीय मंत्री राज्यात दोन दिवसांत तब्बल ३०० सभा घेणार आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघ या मोहिमेतून विंचरून काढला जाणार आहेच पण अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे आजपासून मुलुखमैदान कँपेन
पुण्याची जबाबदारी केंद्रीय मानवसंसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आहे तर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग दक्षिण महाराष्ट्र सांभाळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुरूषोत्तम रूपाला सातारा, सांगली तर माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्धू मुंबईत सभा घेणार आहेत. राज्याचे नेते विनय सहस्त्रबुद्धे ठाणे आणि मुंबईत तर माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर नाशिक येथे सभा घेणार आहेत. शिवाय उमा भारती, विजेंद्र गुप्ता, कैलाश मिश्रा, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे हेही सोमवार मंगळवार या दोन दिवशी राज्यात सभा घेणार आहेत. मुलुखमैदान मोहिमेला अभूतपूर्व यश मिळावे म्हणून सर्वच भाजप नेत्यांनी कंबर कसली असल्याचेही सांगितले जात आहे.