कोणी भरले आहेत आतापर्यंत उमेदवारी अर्ज?

vidhansabha
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल अनेक उमेदवारांनी उत्तर मुंबई मतदार संघातून आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. दिंडोशी मतदार संघातून मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदार संघातून दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज भरले, यात बेलापूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी अर्ज भरले, तर पनवेल मतदार संघातून शेकापतर्फे बाळाराम पाटील, उरणमधून शेकापतर्फे विवेक पाटील यांनी अर्ज भरले.

मनसेची ७१ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर झाली. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कल्याण ग्रामीणमधून रमेश पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार उत्तम ढिकले यांच्या जागी आर. डी. धोंडगे यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेने आतापर्यंत २२५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

राष्ट्रवादीनेही आपली १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत मुंबईतून सचिन अहिर, संजय दिना पाटील, नरेंद्र वर्मा, नवाब मलिक, मिलिंद कांबळे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीवर्धनमधून सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे, तर अकोलेमधून मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याशिवाय छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ, गणेश नाईक आणि संदीप नाईक, धर्मरावबाबा अत्राम आणि भाग्यश्री अत्राम यांची घराणेशाही देखील राष्ट्रवादीने कायम ठेवली आहे. परळीमधून धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे.