
मुंबई : आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला आणि राज्यातील सरकार अल्पमतात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
राज्यात लागू होणार राष्ट्रपती राजवट ?
राज्यपाल विद्यासागर राव यांची भाजप नेते एकनाथ खडसेंनी भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यपालांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. तर पक्षाच्या नेत्यांनी काल रात्री उशिरा सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. पाठिंबा काढल्याने सरकार अल्पमतात आले.
दरम्यान, राज्यपाल यासंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीला आता २३ दिवस राहिले असताना राज्यपाल विद्यासागर राव राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.
