
मुंबई – २५ वर्षांपासूनची असलेली युती आता अखेर तुटलेली आहे. याबाबतची माहिती एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जागावाटपाचा अडलेले घोडे काही पुढे सरकूच शकलेले नाही. अखेर युती संपुष्टात आली आहे.
शिवसेना-भाजपचा २५ वर्षांचा संसार तुटला
विधानसभा निडवणुकीची घोषणा होण्याआधीचपासून शिवसेना-भाजप यांच्यात जागा वाटपावरून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेने दिलेल्या जागा आणि त्यातून घटकपक्षांना न्याय मिळत नसल्याचे सांगत भाजपने युती तोडली आहे. निवडणुकीतील प्रचारा दरम्यान शिवसेनेकडून काही आरोप झाले तर त्याला उत्तर न देण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
दुसरीकडे शिवसेनेसोबतची युती तुटली असली तरी महायुतीतील घटकपक्ष भाजपसोबत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यात शिवसंग्रामचे विनायक मेटे, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. या सर्वांसोबत जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहांनीही राज्यातील जागावाटपाच्या चर्चा थांबण्याची सुचना दिली होती. त्यामुळे आता भाजप, सेना अखेर स्वतंत्रपणे,स्वबळावर लढणार आहेत.
