मुंबई : भाजप नेते आम्हाला न भेटता, चर्चा न करता निघून जाणे हे खेदजनक असून भाजपाची ही भूमिका आडमुठेपणाची असल्याचा सणसणीत टोला शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी भाजपाला लगावला आहे. तर भाजपाचे प्रदेध्याक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपातील तिढा सोडविण्यासाठी शिवसेना अडचण निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना व भाजपामध्ये जागावाटपावरून तेढ निर्माण झाले असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर सकाळपर्यंतच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती फोल ठरल्याचे दिसत आहे. रावते यांनी भाजपाला युतीत स्वारस्य नसल्याचे सांगत निशाणा साधला आहे.
फडणवीस यांनीही सेनेवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, शिवसेनेच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे युतीतील तणाव शिगेला पोहचला असून महायुतीमधील घटकपक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.