
जम्मू – जलप्रलयामुळे काश्मीर खो-यातील प्रमुख पीक असलेले सफरचंदही संकटात सापडले असून येथील फलोत्पादनाचा उद्योगच कोलमडून गेला आहे.
महाग होणार काश्मिरी सफरचंद !
या जलप्रलयामुळे येथील बागायतदारांचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे नवरात्रोत्सवात ग्राहकांसाठी या सफरचंदांची चव महागणार आहे.
नुकताच महाजलप्रलयाचा सामना करणा-या काश्मीरला सावरण्यासाठी किती वष्रे लागतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. देशवासीयांना आपल्या खास काश्मिरी चवीने वेड लावणा-या सफरचंदाचेही प्रचंड नुकसान झाले.
संपूर्ण पीकच या प्रलयात नाहीसे झाले आहे. यामुळे बागायतदार तर संकटात सापडले आहेतच, पण देशभरातील ग्राहकांनाही या सफरचंदाची चव चाखता येणार नाही. तसेच सफरचंद खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आघाडीची औद्योगिक संघटना ‘असोचेम’ने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.
