
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कुणीही माघार घ्यायला तयार नसल्यामुळे या वाटपाच्या मुद्द्याचा शेवटचा अध्याय रविवारी दिल्लीत सादर होणार असून भाजप आपली स्वतंत्र यादी जाहीर करण्याच्या पवित्र्यात आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांचे बिनसले असून २५ वर्षाची युती शेवटची घटका मोजत आहे. जागा वाटपाबाबत शिवसेनेने भाजपला दिलेला १२५ जागांचा प्रस्ताव भाजपने शनिवारी फेटाळून लावला. शिवसेनाही याच आकडय़ावर ठाम असून भाजपला मात्र १३५ जागा हव्या आहेत.
भाजपने फेटाळला शिवसेनेचा प्रस्ताव
ही कोंडी सुटत नसल्यामुळे राज्यस्तरीय सुकाणू समिती याबाबतचा निर्णय केंद्रीय संसदीय समितीला रविवारी कळवेल. तसेच दिल्लीत बैठक होऊन भाजपची पहिली यादी जाहीर केली जाईल अशी माहिती राज्य प्रभारी ओम माथूर यांनी दिली.
भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर नवा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावानुसार भाजपला १२५ तर शिवसेनेला १५६ जागा देण्यात येणार होत्या. मात्र भाजपच्या कोटयातून मित्रपक्षांना जवळपास १० जागा द्याव्या लागणार असल्याने मित्रपक्षांना जागा सोडू नका, त्यांना सत्ता आल्यावर मंत्रीपदाचे आश्वासन द्या असेही या प्रस्तावात होते. मात्र मित्रपक्ष त्यावर राजी नसल्याने भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
