
औरंगाबाद- अवघ्या एका महिन्यावर विधानसभा निवडणूक आली असताना आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘फिप्टी- फिप्टी’ अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी २८८ जागांची चाचपणी पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दक्षिण कराडमधून निवडणूक लढण्याचे संकेतही चव्हाण यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांचे दक्षिण कराडमधून उभे रहाण्याचे संकेत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे औरंगाबादेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळही फोडला. त्यामुळे काँग्रेसनसेही स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरु केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
२८८ जागांसाठी कॉंग्रेसची चाचपणी पूर्ण झाली असून यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचेही संकेत चव्हाण यांनी दिले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या छाननी समितीने दिल्लीत राज्यातील सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघांची चाचपणी पूर्ण केली आहे. यादी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली जाणार असून उमेदवारांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षाच घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.
