
मुंबई – निवडणूक आयोगाने सण, उत्सवाला बाधा येणार नाही, अशी खबरदारी निवडणुका जाहीर करताना घेतली असली तरी याच काळात राज्यातील हजारो मुस्लीम भाविक यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना होत असून ते २० ऑक्टोबरनंतर मायदेशी परतणार असल्याने हे नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतीलच पण ह्याचा फटका उमेदवारांना देखील बसणार आहे.
हजारो हजयात्रेकरूमुळे उमेदवारांना बसणार फटका
४ ऑक्टोबरपासून सौदी अरेबियामध्ये हजच्या प्रमुख विधीला प्रारंभ होत असून त्यासाठी देशभरातील लाखो मुस्लीम सहभागी होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील १८ हजार यात्रेकरूंचा त्यात समावेश आहे. त्यापैकी ८ हजार १८१ हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तर उर्वरित खासगी टूर कंपनीद्वारे यात्रेत सहभागी होत आहेत. खासगी कंपन्यांसाठी एकूण ३४ हजारांचा कोटा आहे. हे १८ हजार भाविक राज्यभरातील आहेत. एकाही ठिकाणी त्यांची संख्या निर्णायक नसली तरी मुस्लिमांना हक्काची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आघाडी तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना त्याचा निश्चितच फटका बसणार आहे. ते भारतात परतेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नवीन सरकार कोणाचे हेही स्पष्ट झालेले असेल.
