आघाडी सरकारचे निर्णय सत्तेत आल्यानंतर रद्द – फडणवीस

devendra-fadnvis
मुंबई : आघाडी सरकारने अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णयांचा महायुतीची सत्ता आल्यानंतर पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे रिपाइ नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचे सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.

महायुतीतील भाजप आणि स्वाभिमानी संघटनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडी सरकारने गेल्या एक ते दीड महिन्यात घेतलेल्या अनेक निर्णयांना हरकत घेतली असून आघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांचा आम्ही फेरविचार करू आणि अयोग्य निर्णय रद्द करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला. फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे या निर्णयांविरोधातील आपली भूमिका मांडली.

मतदारांना लुभवण्यासाठी आघाडी सरकारने तब्बल १०७१ शासन निर्णय जाहीर केले आहेत. या सर्व निर्णयांना आपली हरकत आहे. हे सर्व निर्णय स्थगित करावेत, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. महायुतीची सत्ता आल्यास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला जाईल, असे ते म्हणाले आहेत.

Leave a Comment