मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दक्षिण कराड विधानसभा मतदार संघातून प्रथमच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत असून पक्षांतर्गत बंडाळी मोडून विजयी होण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. चव्हाण ही नवी जबाबदारी कशी पार पाडणार याकडे सार्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तीन वर्षांपूर्वी अत्यंत अडचणीच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या चव्हाण यांनी मिस्टर क्लिन या त्यांच्या प्रतिमेमुळे हा काळ यशस्वीरित्या पार पाडला आहे. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीला पक्षातूनच अनेकांचा विरोध असून दिल्ली दरबारी नेतृत्व बदलावे यासाठी वारंवार आग्रह धरला गेला होता. मात्र हायकमांडने चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवून आगामी निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविली आहे.
चव्हाण यांना जनतेतून निवडून येऊन दाखवा असे वारंवार ऐकविले जात आहे. वास्तविक यापूर्वी तीन वेळा ते कराडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांची ही जागा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी हिसकावून घेतली आणि त्यानंतर चव्हाण यांनी निवडणूक लढविलेली नाही. यावेळी आपल्या मतदारसंघातून विजयी होण्याबरोबरच राज्यात काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करणे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या मगरमिठीतून मुक्त करणे या जबाबदार्याही त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. तसेच महायुतीचे कडवे आव्हानही पेलावे लागणार आहे.