राष्ट्रवादीचा एकला चलो रे!

ncp
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आघाडीतील जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादीने एकला चलो रेचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुंबईत याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

राष्ट्रवादीने काँग्रेसकडे विधानसभा निवडणूकीसाठी १४४ जागांची मागणी केली आहे. तर, राष्ट्रवादीला ११४ जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. जागावाटपा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत बैठक पार पडली होती. मात्र, या बैठकीत जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने २८८ जागांची चाचपणी केली असून, उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

दरम्यान, आज दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment