
सातारा – अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाईची चिंता मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे मिटली असून, जिल्ह्यातील महत्वाची धरणेही काठोकाठ भरली आहेत.
उघडले धरणाचे दार, धरणातून विसर्ग सुरु
पिण्याच्या पाण्याबरोबर वीज निर्मितीची चिंताही सातारा जिल्ह्यातील कोयना धरणही पूर्ण भरल्याने दूर झाली आहे. कोयना धरण क्षेत्रात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने, शनिवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. कोयना धरणातून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे कोयना काठच्या १२८ गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या कोयना धरणामध्ये १०४ टीमसी पाणीसाठा असून, अजूनही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. जून महिन्याच्या अखेरीस या धरणाने तळ गाठला होता. परिस्थिती इतकी भीषण होती की, ज्या धरण पात्रातून बोटीतून जलवाहतूक चालायची. त्या धरण पात्रातून गाडीने प्रवास सुरु होता.
पाणी आटल्याने कोयना धरणाच्या निर्मितीच्यावेळी लुप्त झालेली गावे, मंदिरे वर आली होती. जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा एकदा कोयना धरण काठोकाठ भरले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर कोयना धरणातील पाण्यातून मोठया प्रमाणावर वीज निर्मितीही केली जाते.
