इंग्लंड टीमने केला मालिकेचा गोड शेवट

team-india
लीड्स – इंग्लंडने सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड केला असून यजमान संघाने शेवटच्या सामन्यात भारतावर ४१ धावांनी मात केली. यासह यजमानांनी मालिकेत व्हाईटवॉश देण्याचे टीम इंडियाचे मनसुबे उधळून लावले. भारताने ही मालिका ३-१ ने आपल्यानावे केली.
शतक झळकवणारा इंग्लंडचा ज्यो रुट सामनावीर व भारताचा सुरेश रैना मालिकावीरचा मानकरी ठरला.

भारतासमोर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सात गडी गमावून विजयासाठी २९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात भारताने २५३ धावांत गाशा गुंडाळला. भारताकडून रवींद्र जडेजाने नाबाद ८७ आणि अंबाती रायडूने ५३ धावांची खेळी केली. मात्र, या दोघांनाही संघाचा पराभव टाळता आला नाही. गोलंदाजीत इंग्लंडकडून स्टोक्सने तीन गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच तंबूत परतला. त्यापाठोपाठ विराट कोहली १३ धावांवर बाद झाला. अखेर शिखर धवन आणि रायडूने संघाचा डाव सावरला. धवनने ४४ चेंडूंचा सामना करताना चार चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा काढल्या. तसेच अंबाती रायडूने ६५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या साह्याने ५३ धावा काढल्या. दरम्यान, स्टोक्सने कुककरवी रायडूला बाद केले.

Leave a Comment