पहिल्याच मुंबई भेटीत शहा यांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला

amit-shah1
मुंबई – अमित शहा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच मुंबई भेटीत काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्राशिवाय काँग्रेसमुक्त भारत होणे शक्य नसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुळापासून उखडून फेका, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने ११ लाख ८८ हजार कोटींनी महाराष्ट्राची लूट केली. हा पैसा शोधायचा असेल तर काँग्रेस नेत्यांची मुले, पुतणे, भाचे यांच्या घरी शोधा, अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचारावर हल्ला केला.

amit-shah

षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना शहा म्हणाले, केवळ राज्यातच नव्हे देशपातळीवरही राज्यातील काँग्रेस नेते भ्रष्टाचार करतात. काँग्रेसचे असे भ्रष्ट सरकार आणखी ५ वर्षे राहावे असे आपल्याला वाटते का? नाही ना. मग राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार मुळापासून उखडून फेका. कारण जोवर महाराष्ट्रात काँग्रेस आहे तोवर देश कधीच काँग्रेसमुक्त होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

गेल्या १५ वर्षातील सरकारने मान खाली घालायला लावणारे काम केल्यामुळे चारित्र्यवान भाजप नेत्यांच्या सरकारला निवडून द्या, असे आवाहनही शाह यांनी केले. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र कसा पिछाडीवर पडला, हे विविध आकडेवारींसह मांडताना शाह यांनी सत्ताधाऱ्यांची नियत चांगली असेल तर निसर्गही साथ देतो, असा मिश्किल टोला राज्यातील काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना लगावला.

Leave a Comment