मुंबई – ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यात हिंदूत्त्ववादी विचारांची गाठ पक्की असल्याने ती सुटणार नसल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला असून सेनेने याप्रकरणावर हरियाणात एनडीएचा घटक पक्ष हरियाणा जनहित काँग्रेसने तीन वर्षांपासूनची युती तोडल्यानंतर भाष्य केले आहे.
एचजेसीचे अध्यक्ष कुलदिप बिष्णोई यांनी हरियाणात भाजप आणि हरियाणा जनहित काँग्रेसमध्ये असलेली तीन वर्षांपासूनची युती तोडताना भाजपने वचन पाळले नसल्याचे आरोप केल्यानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये तणाव वगैरे असल्याच्या वृत्तांना सामनाने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
हरियाणा, बिहारमध्ये हिंदुत्त्ववादी विचारांची गाठ नसल्याने तिथे गाठ सुटली. मात्र राज्यात हिंदूत्ववादी विचारांची पक्की गाठ असल्याने ती सुटणार नाही याचे भान सेनेसोबतच भाजपलाही आहे, असे सांगत सेनेने एक गर्भित इशाराच भाजपला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सामनाच्या अग्रलेखातून बिष्णोईंचे मुख्यमंत्री होण्याचे मनोरथ पूर्ण होणार नाही हे स्पष्ट दिसले म्हणून त्यांनी जागावाटपाचा बहाणा पुढे करत युती तोडल्याचेही मांडण्यात आले आहे.
त्याचबरोबर मित्रपक्ष भाजपने इतर राज्याता काय करावे यावर सेनेला काहीही संबंध नाही असे सांगून सामनाच्या अग्रलेखाने महाराष्ट्रात मात्र भाजपला युती तोडता येणार नाही असेही अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.