मुंबई – काँग्रेस राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद आज करणार आहे. आज सकाळी हुतात्मा चौकातून काँग्रेसच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना साक्षी ठेवत काँग्रेस प्रचाराचा आरंभ करणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तारखा अद्याप जाहीर नसल्या तरीही काँग्रेसने या निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केली असून विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणनीती काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे हे ठरवणार आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह आदी नेत्यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. लोकसभा निवडणूकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये आलेले नैराश्य नारायण राणे कसे दूर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.