विरारमध्ये शाळेच्या मागेच सापडले तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह

student
ठाणे – विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडले आहे. या शाळकरी मुलांचे मृतदेह शाळेच्या मागेच आढल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

या तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. तिन्ही मुलं विरारच्या वागड गुरुकुल इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी असून ते नववीत शिकत होते.

हे विद्यार्थी २५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. अखेर आज शाळेच्या मागे असलेल्या नदीत त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडले. शाळेतच हॉस्टेल असल्याने ही मुलं तिथेच राहत होती. मात्र बेपत्ता झाल्यानंतर विरार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राहुल, मेहुल आणि मीत अशी या तीन मुलांची नावे असल्याचे समजते. या मुलांचा नदीत पाय घसरुन बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Leave a Comment