
लातूर : महायुतीतील घटकपक्षांना मिळून 20 ते 25 जागा मिळाल्यास आम्ही समाधानी राहू असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केल्यामुळे विधासभेसाठी महायुतीच्या घटक पक्षात एकवाक्यता नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जानकरांच्या वक्तव्याने होणार शेट्टी, आठवले, मेटेंची गोची
माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी लातूर मध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. त्यावेळी महादेव जानकर यांनी जागावाटपाबाबत हे वक्तव्य केल्यामुळे राजू शेट्टी, विनायक मेटे तसंच रामदास आठवले यांच्या पक्षांची गोची होणार आहे.
त्याचबरोबर त्यांनी ज्या ठिकाणी भाजप आणि धनुष्यबाणाला कधीच मतांचा ओघ वाढवता आला नाही त्याच जागा आम्ही मागत असल्यामुळे त्या जागा देण्यास काय हरकत असल्याचेही स्पष्ट केले.
यापूर्वी एकट्या रामदास आठवले यांनी 13 जागांची मागणी केली आहे. तसंच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 38 जागांची मागणी केली आहे, तर विनायक मेटे यांनी 15 जागा मागितल्या आहेत.
महादेव जानकर यांच्या वक्तव्याने महायुतीच्या घटक पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. शिवाय या घटक पक्षांमध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. कालच पुण्यात महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाल्यामुळे आता घटक पक्षांनी किती जागा मिळणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
