परदेश दौऱ्यावर नातेवाईकांना नेण्यास बंदी

bcci
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नातेवाईकांना परदेश दौऱ्यावर घेवून जाणाऱ्या खेळाडूंना चांगलाच दणका दिला असून भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावेळी खेळाडूंना आपल्या नातेवाईकांना सोबत नेण्यास बीसीसीआयने बंदी घातली असून दौऱ्यादरम्यान एखाद्या खेळाडूची पत्नीही केवळ काही दिवसच त्याच्यासोबत राहू शकते असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाल्यामुळेच बीसीसीआयने हा कठोर निर्णय घेतला आहे.
सध्या भारतीय संघ परदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा क्रिकेटपटू आपल्या पत्नी आणि मुलांना सोबत नेऊ शकतात. अगदी दौरा संपेपर्यंत ते त्यांच्यासोबत राहतात.

सध्या पत्नीसह मैत्रीणीलाही परदेश दौऱ्यावर घेवून जाण्यास परवानगी मिळत होती. परदेशात झालेल्या अनेक क्रिकेट मालिकांदरम्यान विराट कोहली याने मैत्रीण अनुष्का शर्माला सोबत नेले होते.

परदेश दौऱ्यादरम्यान पत्नी अथवा मैत्रिणीला सोबत नेल्यास याचा खेळाडूंच्या सरावावर तसेच एकूणच कामगिरीवर परिणाम होतो. यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होवू नये याकरीता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.