
मुंबई – कृष्णजन्माष्टमी सोहळ्याच्या एक दिवस आधी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून दुसर्या पंथांना पचवण्याची ताकद हिंदूत्वात असल्याचे वक्तव्य भागवत यांनी केले आहे. याचबरोबर मागील दोन हजार वर्षांमध्ये हिंदू धर्माची पचनक्रिया थोडी बिघडल्यामुळे शैथिल्य आले होते, आजही आम्ही त्याचे दुष्परिणाम भोगत असून ‘हिंदुस्थान एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदुत्व हीच त्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर धर्मांना पचविण्याची हिंदुत्वामध्ये शक्ती – सरसंघचालक
मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच ओडिशामधील कटक येथे सरसंघचालक भागवतांनी, सर्व भारतीयांची ओळख हिंदू म्हणून झाली पाहिजे. सध्या देशात राहाणारे सर्वजण याच महान संस्कृतीचे वंशज आहेत. जर इंग्लंडमधील लोकांना इंग्रज, अमेरिकेतील लोकांना अमेरिकन आणि जर्मनीतील लोकांना जर्मन म्हटले जाते तर मग, हिंदूस्थानात राहाणार्यांना हिंदू का म्हणत नाही? असे, म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, डाव्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
