
मुंबई – महायुतीचे जागावाटप अजूनही अंतिम झाले नसतानाही पुढील चार दिवसात भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार असून पहिली यादी कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त २५ उमेदवारांची असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. भाजप गेल्या २५ वर्षाचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याचा आग्रह करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपची जागावाटपापूर्वीच पहिली यादी
शिवसेना आणि भाजप यांच्यात मागील २५ वर्षापासून युती आहे. भाजपने या काळात नेहमीच समजूदारपणाची भूमिका घेतल्यामुळे भाजपला सध्या २६ जागा लढवाव्या लागत आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या मागणीनुसार सहा जागा त्यांना दिल्या गेल्या आहेत.
पण सध्या देशासह राज्यात भाजपची ताकद वाढली आहे. हे पाहता भाजपने वेळोवेळी जागांबाबतीत केलेल्या तडजोडीचा हिशेब या वेळी शिवसेनेला द्यावा लागणार आहे. राज्यसभेची एक जागाही भाजपने मित्रपक्षासाठी सोडली होती. त्याची आठवणही जागावाटपावेळी शिवसेनेला करून दिली जाईल. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र हे निश्चितच बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
