पुणे – भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये प्रस्तावित पुणे मेट्रो प्रकल्पावरून चांगलाच कलगीतुरा रंगत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरला झुकते माप देत मोदी सरकारने पुण्यातील मेट्रो प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची टीका केल्यानंतर भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दोन महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्यावर एनडीए सरकारवर टीका करण्यापेक्षा मागील 15 वर्षापासून राज्यात व केंद्रात 10 वर्षे सत्तेची फळे चाखणा-या यूपीए सरकारने याबाबत काय केले असा सवाल करीत अजित पवारांना उत्तर दिले आहे. 2010 मध्ये राज्य सरकारकडे पुणे मेट्रोचा प्रस्ताव गेला आहे. मागील चार वर्षात याबाबत काय काय झाले ते जाहीर करावे. स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारवर खापर कशाला फोडता अशी जळजळीत टीकाही भंडारी यांनी केली. दरम्यान, नागपूर-पुणे मेट्रोवरून आगामी काळात भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.