मुंबई: दहीहंडी उत्सवाचे नेमके काय होणार? यावर अजूनही प्रश्न चिन्हच आहे कारण आता गोविंदा पथकांनी आडमुठी भूमिका घेतली असून दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणेच साजरा करण्याचा निर्धार केला आहे. इतकेच नाही तर दहीहंडीसाठी जे थर लावण्यात येतात, त्यातही कुठली तडजोड होणार नसल्याचे गोविंदा पथकांनी म्हटले आहे.
आज दहीहंडी पथकांनी हा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जी कारवाई होईल त्या कारवाईला पथके सामोरे जातील, असे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्या दहीहंडी आयोजकांनी माघार घेतल्याच्या भूमिकेवरही गोविंदा पथकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. गोविंदा
पथकांना मिळणारी रक्कम ही फार मोठी नसते. त्यातही मुलांचा खर्च वगळून राहणारे पैसेही आम्ही लोकोपयोगी कामात खर्च करतो, मग अशा खेळावर फक्त सुरक्षेचे कारण सांगून निर्बंध घालणे किती योग्य आहे? असा सवाल पथकांनी केला आहे.