
ठाणे- ठाण्यातील ‘संस्कृती’ प्रतिष्ठानने गोविंदांचे होणारे अपघात टाळण्यासाठी यावर्षीपासून दहीहंडी कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी ठाण्यात दहीहंडी उत्सव आमदार प्रताप सरनाईक हे साजरा करतात. मात्र नवी मुंबईतील बालगोविंदाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीच्या बेहरामबाग गणेश नगर येथे ओमसाई मित्रमंडळातील ऋषीकेश पाटील (वय १८) या गोविंदाचा सरावादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
‘संस्कृती’ प्रतिष्ठानची दहीहंडी कायमची बंद
न्यायालय आणि पोलिस प्रशासनाने थरांची मर्यादा आणि बालगोविंदांचा सहभाग याबाबत हरकत घेतली असतानादेखील अनेक गोविंदा पथकांनी सरावादरम्यान त्यांची हेकेखोरी कायम ठेवली आहे. सात ते आठ थरांची हंडी फोडण्यासाठी लाखोंच्या बक्षिसांचे आमिष आणि बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथकांचा बालगोविंदांच्या जिवाशी जीवघेणा खेळ सुरु आहे.
आमदार सरनाईक यांनी यावर्षीपासून ठाण्यातील ‘संस्कृती’ प्रतिष्ठानतर्फे आयोजित केली जाणारी दहीहंडी हे निदर्शनास आल्याने गोविंदांचे अपघात टाळण्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे दरवर्षी दहीहंडी उत्सव पारंपारीक पद्धतीने आणि अत्यंत साधेपणाने साजरे करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
