
मुंबई – राज्य सरकारने जुलै महिन्यात डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे राज्यातील २३४ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
डॉक्टरांच्या संपामुळे २३४ जणांनी गमावले प्राण
आपल्या विविध मागण्यांसाठी एक ते सात जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटने (मॅग्मो)च्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे २३४ जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नवजात बालकांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. डॉक्टरांचा हा संप बेकायदेशीर असल्याचे राज्य सरकारने सांगितले असून तसेच जे डॉक्टर संप काळात उपस्थीत नव्हते त्यांचा पगार कपात केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा झालेला मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली.
