
रायगड : पालकमंत्री सचिन अहिर यांनी महाड येथे येत असलेल्या पूर तथा इतर आपत्ती संदर्भात कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा नियोजनातून विशेष तरतूद करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे प्रतिपादन काल महाड येथे केले. महाड येथील विश्रामगृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते.
आपत्ती निवारणासाठी जिल्हा नियोजनात विशेष तरतूद – सचिन अहिर
श्री. अहिर म्हणाले, महाड शहरात प्रत्येक वर्षी येणारा पूर, नदीत असलेला गाळ, संरक्षण भिंत याबाबत होणारी निधीची अडचण पाहता जिल्हा नियोजनात यासाठी विशेष तरतूद करुन हा प्रश्न भविष्यात कायमस्वरुपी निकाली कसा काढता येईल यासाठी कार्यवाही करावी. शासनाकडून निधीची मागणी करताना प्रस्ताव एकत्रित आल्याने रक्कम वाढते. त्यामुळे प्रस्ताव बारगळा जाण्याची शक्यता असते. त्यासाठी याबाबत वेगवेगळे कामांचे प्रस्ताव दिल्यास त्याचा विचार होऊ शकेल.
