
मुंबई – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणा-या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी वाढ केली असून स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना आता 10 लाखांऐवजी 50 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्याला 7.5 लाखांऐवजी 30 लाख तर कांस्य पदक विजेत्याला 5 लाखांऐवजी 20 लाख रुपये मिळणार आहेत.
सुवर्णपदक राज्य सरकार देणार 50 लाख
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नुकत्याच ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकाची कमाई केली आहे. खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या बक्षिसाच्या रकमेतही राज्य सरकारने मोठी वाढ केली आहे. त्यानुसार प्रशिक्षकांना अनुक्रमे अडीच लाखांऐवजी 12.5 लाख, 1 लाख 87 हजार 500 रुपयांऐवजी 7.5 लाख आणि 1.25 लाखाऐवजी 5 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
याआधीच राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणा-या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शासकीय सेवेत विविध पदांवर सामावून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतर पदक विजेत्यांनाही याप्रमाणे शासकीय सेवेत घेण्यात येणार आहे.
