माळीण गावाचे शासकीय खर्चाने पुनर्वसन

maalin
मुंबई – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १५२ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एखाद्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती दगावल्या असल्यास त्याकुटुंबाच्या कायदेशीर वारसास देण्यात येणारी रक्कम ही गावाच्या पुनर्वसनासाठी वापरली जाईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

माळीण आपत्तीबाबत आज, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत या आपत्तीमुळे १७६ घरांपैकी ४७ घरे बाधित झाली असून आतापर्यंत १५२ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. माळीण गावच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. जी घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत, त्यांचे पुनवर्सन करताना घरांबरोबरच भांडीकुंडी व जीवनावश्यक वस्तुंचे असे ‍विशेष पॅकेज देणार असून पुनर्वसनासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गावाचे शासकीय खर्चाने पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या आपत्तीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा चव्हाण यांनी केली.

पडकईमुळे ही दुर्घटना झाल्याचे वृत्त चुकीचे असून माळीण गावातील शेत जमिनीचे नुकसान झाल्याने शेत जमीन सुधारणेचा कार्यक्रम हाती घेणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या संभाव्य आपत्तीप्रवण गावांचे सर्वेक्षण करून त्या गावांचे पुनर्वसन करणात येणार आहे.

Leave a Comment