
परळी – संपूर्ण राज्यावर जरी पावसाने कृपा केली असली तरी मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणीटंचाईचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला. पाणीटंचाईमुळे परळीतील संपूर्ण वीजनिर्मितीच बंद पडली आहे.
परळीत औष्णिक वीजनिर्मिती ठप्प
१ हजार १३० मेगावॉट वीजनिर्मितीची परळी येथील औष्णिक विज निर्मिती केंद्राची क्षमता असून येथे २१० मेगावॉटचे तीन आणि २५० मेगावॉटचे दोन वीजनिर्मिती संच आहेत. मात्र वीज निर्मीतीसाठीचे पाणीच या संचातून सध्या उपलब्ध नाही.
खडका बंधारा आणि जायकवाडी, माजलगाव धरणातून या संचांसाठी लागणारे पाणी पुरवले जाते. पण पाऊस नसल्यामुळे सध्या या धरणांमध्येच पाणी नसून वीजनिर्मिती पूर्णपणे कोलमडली आहे. वीज निर्मीती ठप्प झाल्याने त्याचा राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन राज्याचा बराच मोठा भाग अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
