पुणे – काळाने पहाटेच्या सुमारास आंबेगाव जवळच्या माळीणचे गावकरी साखर झोपेत असतानाचा त्यांच्यावर घाला घातला, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे डोंगरकडा माळीण गावावर कोसळला आणि सर्वजण ढिगा-याखाली गाडले गेले. या घटनेचा कित्येक तास उलटूनही कोणालाच पत्ता नव्हता. मात्र गावातील एका एसटी चालकामुळे ही दुर्घटना उघडकीस आली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. माळणची एसटी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गावात आली, पण नेहमीच्या रस्त्याऐवजी फक्त मातीचा मोठ्ठा ढिगारा आणि त्याखाली दाबली गेलेली घरे एसटीचालकाला दिसली. प्रसंगावधान राखत त्याने स्थानिक प्रशासनाला लगेच या दुर्घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी प्रशासन व आजूबाजूच्या गावातील गावक-यांनी ताबडतोब धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि ढिगा-याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर बचावपथकाच्या अधिका-यांना पाचारण करण्यात आले. सध्या जेसीबी, पोकलेनने ढिगारे बाजूला काढण्याचे काम सुरु असून रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आत्तापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.