अजित पवारांकडून शिवसेना,’अच्छे दिन’ची खिल्ली

ajit-pawar
नागपूर – महाराष्ट्र सदनावरून निर्माण झालेल्या वादात एकाकी पडलेल्या शिवसेनेची आणि महागाईवरून मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच खिल्ली उडवली.

नागपूर येथे राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात अजित पवार यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेताना वाघाचे आता मांजर झाले आहे ,अशी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शिवसेनेला जीवदान मिळाले. त्यांचे १८ खासदार निवडून आले असले तरी दिल्लीत काही किंमत नाही. त्यांनी जागा वाढवून देण्याची मागणी केली पण, पंतप्रधानांनी ती फेटाळून शिवसेनेच्या वाघाचे मांजर केले. सानिया मिर्झाने देशाचा नावलौकिक उंचावला पण, तिच्यावरही टीका करण्यात येत असल्याचे सांगून अजित पवार यांनी महागाईवरून भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवली.

उत्तर प्रदेशात मायावती यांनी बहुमत मिळवले. आता मुलायमसिंह यांनी संपूर्ण राज्य ताब्यात घेतले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व आहे. तामिळनाडूत जय​ललिता यांनी दर पाच वर्षांनी विजय मिळवला. विदेशात राहिल्याने नवीन पटनायक यांना ओरिया भाषा येत नाही तरीही त्यांची सत्ता येते. मात्र, या सर्व नेत्यांहून जबरदस्त ताकद असताना शरद पवार यांना विदर्भात साथ मिळत नाही. त्यांनी राज्यात भेदभाव केला नाही. नाशिक, औरंगाबादने साथ दिली, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment