इशांतचे मन उसळत्या माऱ्यासाठी वळवणे माझ्यासाठी कठीण!

ishant
लंडन- माझ्यासाठी व संघासाठी लॉर्ड्स मैदानावरील विजय निश्चितच ऐतिहासिक स्वरुपाच आहे. पण, तो मिळवण्यापूर्वी उसळता मारा करण्यासाठी इशांतचे मन वळवणे फारच कठीण होते, अशी दिलखुलास प्रतिक्रिया भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली.

`वास्तविक, प्रत्येक कसोटी विजय खास असतो. पण, यावेळी मला 2007 मालिकेतील लॉर्ड्स कसोटीची आठवण झाली. त्यावेळी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी मी व श्रीशांत क्रीझवर होतो. ती कसोटी आम्ही वाचवली होती आणि तोच नैतिक विजयही होता. अर्थात, लॉर्ड्सवरील विजयाचा आनंद काही औरच असतो आणि तीच अनुभूती आम्ही सर्व सहकारी सध्या घेत आहोत. यापूर्वी दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौऱयातील काही कसोटी सामन्यात आम्हाला विजयाच्या उंबरठय़ावरुन परतावे लागले होते. आता मात्र ती कसरही आम्ही भरुन काढली आहे’. अशी पुष्टी माहीने पुढे जोडली.