लंडन – दुसऱया कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वी घंटा वाजविण्याचा मान भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला मिळाला.
खेळ पाच मिनिटे घंटा वाजविल्यानंतर सुरू करण्यात येतो. गांगुलीचा माजी सहकारी राहुल द्रविडला पहिल्या दिवशी तर कपिल देवला चौथ्या दिवशी हा मान मिळाला होता. एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटीचा गांगुली हा सदस्य असून त्याने भारतातर्फे 113 कसोटी व 311 वनडे सामने खेळले आहेत. त्याने लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केले होते आणि अनिर्णीत राहिलेल्या त्या कसोटीत त्याने शतक झळकवले होते. त्याला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 18575 धावा जमविताना 38 शतके झळकवली, त्यातील 16 कसोटी शतके आहेत. 1 ऑक्टोबर रोजी त्याला एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटीत स्थान देण्यात येणार आहे. भारतातर्फे कपिलदेव व राहुल द्रविड यांनाही या समितीत स्थान देण्यात आलेले आहे.