उद्धवनेच साहेबांना छळले – नारायण राणे

rane
रत्नागिरी : कोकण भयमुक्त करणार असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र, कोकणातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्हय़ात भीतीचे वातावरण नाही. उद्धव यांनी बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास दिला असून साहेबांचा मानसिक छळ सुद्धा त्यानेच केल्यामुळे उद्धव याने माझ्यावर टीका करू नये, नाहीतर मी त्याचे वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना दिला.

राणे यांनी मंत्रीपदाचा राजीमाना देण्याची घोषणा केल्यानंतर सिंधूदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱयावर आले आहेत. यावेळी हातखंबा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत असताना राणे म्हणाले की शिवसनेतील शेवटची 15 वर्षे मी साहेबांच्या सर्वात जवळ होतो. साहेबांना सर्वात जास्त उद्धवने छळले.

उद्धव यांचा कोकणाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासात दूरपर्यंत संबंध नाही. ते कोकणवासियांच्या सुखदुःखात कधी सामिल झालेच नाहीत. उद्धव यांना कोकणाची आर्थिक स्थिती, बेकारी, मासेमारी क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नाही. मागील दोन वर्षांपासून उद्धव माझ्यावर टीका करीत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर तर यात वाढ झाली आहे. त्यांनी संयम आणि वैचारिकता सोडली असून, तोंडाला येईल ते बरळत आहेत. उद्धव यांना महागाई, दरवाढ यांवर बोलता येत नाही, कारण त्यांचा यासंदर्भातील अभ्यासच नाही, अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

शिवसेना ही नेतृत्वहीन संघटना आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले 18 खासदार ही मोदीकृपा आहे. यात त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. दर दोन महिन्यांनी माध्यमांसमोर जाऊन मी मर्द असल्याची भाषा करतात. मात्र, जे मर्द असतात त्यांना असे सांगत फिरावे लागत नाही, अशी घणाघाती टीका राणे यांनी उद्धव यांच्यावर केली.

Leave a Comment