सांगली – विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या शिवसेनेने पक्षातून बाहेर गेलेल्यांसाठी नवी रणनीती आखली असून पुन्हा स्वगृही येण्याचे आमंत्रण देवून मुख्यमंत्रीपदाचे गणित सुकर करण्याच्या हालचाली
चालविल्या आहेत, तसे संकेत सेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.
शिवसेनेत परतायचेय ,लगेच या ;अन्यथा दारे बंद ; ठाकरे
ज्यांना शिवसेनेत यायचे आहे त्यांना कोणी अडवलेले नाही. त्यांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगलीत घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यादरम्यान केले.
राष्ट्रवादीचे नेते व सार्वनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भुजबळ आणि केसरकर यांना टोला लावला. ज्यांना शिवसेनेत यायचयं त्यांनी लवकरात लवकर यावे, वेळ लावल्यास शिवसेनेची दार बंद केली जातील. विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे ठाकरे यांनी या वेळी नमूद केले. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आता भुजबळही केसरकरांच्या वाटेवर चालतील का याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.परिणामी राष्ट्रवादीसह मनसेलाही या आवाहनाचा फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.