
जळगाव – लोकसभेप्रमाणे मनसे उमेदवारांच्या दारुण पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता खबरदारीचा पवित्रा घेतला आहे,विधानसभेला जे उमेदवार इच्छुक आहेत ,त्यांची आता परीक्षा घेतली जाणार आहे,कारण यंदा खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा ‘परीक्षेचा पॅटर्न’!
‘मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी माहिती देताना ही बाब स्पष्ट केली. निवडणुकीसाठी इच्छुकांची चाचपणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,उमेदवार निवडीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्य दौरा १५ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यात इच्छुक उमेदवारांचा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार येथे निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. लोकसभेप्रमाणे मनसे उमेदवारांच्या दारुण पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनसे काळजी घेत आहे. राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार, विधानसभा निवडणुकीस इच्छुक असलेल्यांची यंदाही परीक्षा घेतली जाणार आहे. मनसेकडून ठरविण्यात आलेल्या संपूर्ण रुपरेषेच्या पालनासह लेखी परीक्षेला उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे.
