कराड – महाराष्ट्राच्या नेतृत्त्वबदलाच्या बातम्या पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावत हा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.
कराडमध्ये आनंदराव चव्हाण व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मलकापूर नगरपंचायतीच्यावतीने रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत कन्या सुरक्षा अभियानाचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेले चव्हाण एकदम निर्धास्त वाटत होते. तसेच नेतृत्त्वबदलाचे वृत्त फेटाळून लावले. दर 10-15 दिवसाला असे खोडसाळपणे वृत्त देण्यात येतात. मला अद्याप हायकमांडकडून कोणत्याही बदलाची माहिती कळवलेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री कराडमधून आषाढी एकादशीच्या पूजेसाठी आज सायंकाळी पंढरपूरकडे रवाना होत आहे. श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सपत्निक पंढरपूरात दाखल होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे 2.30 ते 2.55 केली जाणारी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा, त्या नंतर पहाटे 3.00 ते 3.20 या वेळेत रुक्मिणीमातेची शासकीय पूजा, पहाटे 3.25 ते 4.00 या वेळेत मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार असे मंदिर समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.दुसरीकडे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे बोलले जात असले तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गटाने विखे-पाटलांचे नाव पुढे केले आहे. कदाचित मुख्यमंत्रीपद नाही तर प्रदेशाध्यक्षपद त्यांना मिळू शकते