मुंबई – मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने मुंबईकरांचे दुसऱ्या दिवशीही हाल सुरूच आहेत. पालिका प्रशासनाने पावसासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. याचा परिणाम म्हणून मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळित झाली होती.
आजही मुंबईकरांचे हाल सुरूच
तर नालेसफाईचे दावेही फोल ठरल्यामुळे रस्त्यांवरही पाणी साचले आणि याचा फटका वाहतुकीला बसला. मुंबईत आजही अशाच पद्धतीने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेध शाळेने वर्तवला आहे. जुलै महिन्यात दाखल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत दैना उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत चांगलाच गारवा पसरला आहे.
कचऱ्याने मिठी, दहिसर, पोयसर नद्या आणि नाल्यांचे प्रवाह रोखल्याने अनेक भाग जलमय झाले. तसेच काही वस्त्या आणि विभाग पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेने केलेल्या रस्त्यालगतच्या गटारांची सफाईही उघडी पडली.
भायखळा, बधवार पार्क, मुंबई सेंट्रल, दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, धारावी, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, सांताक्रूझ, मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, दहिसर, मिलन सब वे या ठिकाणी पाणी साचले होते.