कांदा पुन्हा रडवणार

kanda
नाशिक – कांद्याचे नाशिक जिल्ह्यात दर २५०० रूपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. दुष्काळामुळे कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे दर तेजीत आहेत.
कांद्याच्या सरकारी दरातही गेल्या महिनाभरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. याचा फायदा घेत किरकोळ बाजारात कांद्याची विक्री पन्नास ते साठ रूपये किलो या दराने केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य मात्र संकटात सापडले आहेत.

सोमवारी वाशी येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर २५ ते २७ रुपये किलो झाले. किरकोळ बाजारात तो ३० ते ३५ रुपये किलोने विकला जाऊ लागला असून, रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेला कांदा महागला आहे.

येत्या काही दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास कांद्याचे भाव आणखी कडाडणार आहेत. पाऊस न पडल्यास बी फुकट जाईल, या भीतीने शेतकरी कांदा पेरणीसाठी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे. त्यात भर म्हणजे बाजारात कांदा बियाणांची कमतरता असून, दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.

निर्यातमूल्य वाढवूनही कांद्याचे दर वाढू लागले आहेत. वाशी येथील घाऊक बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याचे दर किमान आठशे रुपयांनी वाढले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याला सर्वाधिक २४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आगामी दिवसात कांदा आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत. सध्या दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून उन्हाळ कांद्याला मोठी मागणी होत असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment