सेंद्रीय शेती हीच आधुनिक शेती

sheti
शेतांमध्ये रासायनिक खतांचा भरपूर वापर केल्याचे दुसरेही अनेक दुष्परिणाम सध्या जाणवायला लागले आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा आणि गांडूळ खताचा वापर करणे अनेक दृष्टीने हिताचे आहे, असे सर्वांच्याच लक्षात यायला लागले आहे. १९६० च्या दशकामध्ये भारतात देशाला पुरेल एवढे धान्योत्पादन होत नव्हते. आज आपल्या देशात २५ कोटी टन धान्योत्पादन होेते. १९५० साली या देशात अवघे सहा कोटी टन धान्य उत्पादन होत होते. आजच्या मानाने त्यावेळची लोकसंख्या कमी होती. आज लोकसंख्या १२५ कोटीवर गेली आहे आणि १९५० साली ती अवघी ३८ कोटी होती. असे असले तरीही त्या लोकसंख्येच्या मानाने ते सहा कोटी टन धान्य उत्पादन कमीच होते. आपल्याला परदेशातून धान्य आयात करावे लागत असे. अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशातून आपण सतत धान्य आयात करीत होतो. आपल्या देशात शेती करायला चांगले वातावरण असतानाही आपल्यावर ही वाईट वेळ आली होती.

आपल्या देशाच्या केन्द्रीय मंत्रिमंडळात तेव्हा अन्न मंत्री असा एक मंत्री नेमलेला असे आणि त्याच्याकडे परदेशातून धान्य मागून आणणे हेच एक काम सोपवलेले असे. भारताचा भिकेचा वाडगा जगासमोर सदैव काही तरी मागण्याकरिता पसरलेला असे. धान्याच्या बाबतीत स्वावलंबन गाठणे हे त्या काळात आपले सर्वात मोठे इप्सित होते. त्यासाठी धान्याची पैदास वाढवणे आवश्यक झाले होते. ती वाढली नसती तर भारतातल्या लाखो लोकांना उपासमार सहन करावी लागली असती. ती टाळण्यासाठी ताबडतोबीने धान्य उत्पादन वाढावे म्हणून सरकारने रासायनिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांना बक्षिसे सुद्धा देण्यात आली. रासायनिक खतांचा वापर करणारा शेतकरी म्हणजे सुधारलेला शेतकरी असे त्या काळी समजले जात होते. परंतु आता रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर दिसायला लागले आहेत आणि विचार करणारे तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणारे शेतकरी रासायनिक खताच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा वापर करायला लागले आहेत. त्यामुळे आता आधुनिक आणि सुधारलेल्या शेतकर्‍यांची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे. जो रासायनिक खताचा वापर कमी करतो आणि सेंद्रीय खताचा वापर जास्त करतो तो खरा सुधारलेला शेतकरी असे आता समजले जायला लागले आहे.

रासायनिक खतांचा वापर जितका जास्त करू तितकी जमिनीची प्रत बिघडते हे तर खरे आहेच. पण शेतातल्या जमिनीमध्ये असणार्‍या गांडुळांची संख्या कमी होते. कारण रासायनिक खत गांडूळाला मानवत नाही. ज्या जमिनीत रासायनिक खताचा वापर जास्त होतो त्या जमिनीत गांडूळाची संख्या कमी व्हायला लागते. गांडूळ कमी झाले की, शेतातल्या मातीमध्ये असणारे कृमी, कीटक आणि रोगजंतू हे मोकाट सुटतात. कारण त्यांचा ङ्गडशा उडविणारे गांडूळ कमी झालेले असतात. त्यामुळे रासायनिक खत जितका जास्त वापरू तितके पिकांवर रोग जास्त पडायला लागतात. वर्षानुवर्षांच्या निरीक्षणानंतर असे आढळले आहे की, ज्या शेतात रासायनिक खतांचा मारा केला जातो त्या शेतातल्या पिकांवर रोगही जास्त पडतात. म्हणजे रासायनिक खतांमुळे आधी खतांचा खर्च वाढतो आणि नंतर औषधांचे खर्चही त्या पाठोपाठ वाढायला लागतात. शेतांमधल्या पिकांवर औषधांचा मारा जास्त केला की, शेतातली पिके विषारी व्हायला लागतात. औषधे मारल्यामुळे अळ्या आणि लहानसहान कीडी मरतात हे खरे, परंतु अशा प्रकारे मरून पडलेल्या अळ्या किंवा किड्यांना खाण्यासाठी चिमण्या किंवा अन्य काही पक्षी शेतामध्ये यायला लागतात आणि अशा अळ्यांना खायला लागतात तेव्हा त्या अळ्या खाणारे पक्षी सुद्धा मरण पावतात. कारण त्या अळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारलेले औषध पक्ष्यांच्या पोटात जात असते.

पक्ष्यांना सुद्धा बुद्धी असतेच. शेतातल्या अळ्या खाल्ल्यामुळे पक्षी मरत आहेत हे त्यांच्या लक्षात येते आणि ते पक्षी पुन्हा शेताकडे ङ्गिरकत नाहीत. हे पक्षी शेतामध्ये येत राहणे त्यांनी शेतातल्या अळ्या, कीडी खाणे आणि जाताना शेतात विष्ठा टाकून जाणे या गोष्टी शेतीतले नैसर्गिक चक्र ङ्गिरत राहण्यासाठी आवश्यक असते. परंतु हे पक्षी शेताकडे ङ्गिरकेनसे झाले की हे चक्र तुटते आणि शेताला आयतेच मिळणारे हे खत मिळेनासे होते आणि शेतातल्या किड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार औषधेच वापरावी लागतात. त्याचा परिणाम होऊन शेतातला खर्च वाढतो, पिके विषारी होतात आणि परिणामी पिकांचा दर्जाही घसरतो. तेव्हा हे सारे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर हितकारक ठरणार आहे.

1 thought on “सेंद्रीय शेती हीच आधुनिक शेती”

  1. विश्वास विष्णू गुंजाळ

    सेंद्रीय शेती हिच काळाची गरज आहे.

Leave a Comment