पाऊस लांबला, पण भाज्या महागल्या

bhaji
बुलडाणा – पावसाळा लांबल्यामुळे दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे आणि पाऊस न पडल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पावसाचा जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही. त्यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी आवक एकदम घटली. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दहा शेतकर्‍यांकडून हा माल जमा करावा लागतो.

पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे तेही परवडत नाही.

शहरातील भाजी बाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. व्यापार्‍यांकडून लिलाव करण्यात करण्यात येतो. लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात. व्यापार्‍यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात. तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो.

Leave a Comment