वॉशिंग्टन – गत महिन्यात अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने हल्ला घडवून आणल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
विश्वासार्ह पुराव्याच्या आधारावर अमेरिकेने हा दावा केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी ही माहिती दिली.लष्कर-ए-तय्यबा आणि त्याच्या नेत्यांवरील निर्बंधाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हार्फ यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने लष्करवरील निर्बंध अधिक कडक केले आहेत. हार्फ यांनी या हल्ल्यासंबंधी अधिक माहिती उघड करण्यास नकार दिला.नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी सोहळयाच्या तीन दिवस आधी २३ मे रोजी दहशतवाद्यांनी हेरातमधील भारतीय दूतावासावर मशीन गन, रॉकेट आणि ग्रेनेडच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढवला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळयासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते. दूतावासातील अधिकारी-कर्मचा-यांना ओलीस ठेवून, शपथविधीपूर्वी भारत सरकारला अडचणीत आणण्याचा लष्कर-ए-तय्यबाचा डाव होता.