
अहमदनगर – राज्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्टच राहिलेली नाही. गृहमंत्री पाटील करतात काय? असा प्रश्न करीत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी गृहमंत्र्याच्या बदलीची मागणीही केली आहे.
गृहमंत्री बदलण्याची काँग्रेसची मागणी
गृहमंत्र्यांवर अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांनी टीकेची झोड उडवली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील ज्येष्ठ नेते एकमेकांवर अशी जाहीर टीका करु लागल्यामुळे आघाडातील वाद पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दलितांवरील राज्यात अत्याचार वाढत आहेत. मात्र पोलिस आणि सरकारी वकील या बाबत गंभीर नाहीत. राज्याला कणखर गृहमंत्र्याची गरज आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांना बदलले पाहिजे, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली आहे.
खर्डा दलित हत्याकांड प्रकरणी काल दलवाई आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका सुशीला मोराळे यांनी अहमदनगर मधे एक पत्रकार परिषद घेवून आघाडीतील राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना घरचा अहेर दिला. उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये महाराष्ट्रापेक्षा दलित अत्याचारात शिक्षेचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पुढील आघाडी सरकार मध्ये गृहखाते काँग्रेसकडे घेण्याचा मनोदय हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.
