
मुंबई – सध्या राज्यात आघाडीमध्ये नेतृत्त्वबदलाचे वारे वाहत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार करण्याच्या पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील नेतेमंडळींच्या प्रयत्नानंतर आता राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा सुरु आहे. भास्कर जाधव यांच्या जागी सुनील तटकरे यांची विधानसभा निवडणुकीपुर्वी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलासंबंधी राष्ट्रवादीची बुधवारी बैठक
त्या संदर्भात राष्ट्रवादीने बुधवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवी विस्तारीत कार्यकारिणी तयार करण्यात येणार असून, भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्या अखत्यारितील कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता न आल्याने पक्षसंघटनेत बदल करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत रायगड मतदासंघातून तटकरे यांच्या थोडक्या मतांनी पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
