टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

tata-nano
मुंबई – गुजरातच्या सानंद येथे उभारलेला टाटा मोटर्सने आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट बंद केला आहे. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ३५ ते ४० दिवसांपर्यंत ‘टाटा’ कंपनीचा हा प्लान्ट बंद राहू शकतो. ‘नॅनो’ची मागणी दिवसेंदिवस कमी होत गेल्याने शेकडो तयार गाड्या येथे धूळ खात पडल्या आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात या प्लान्टची क्षमता आणि उत्पादनाचे काम कमी करणे सुरू केले होते.

यापूर्वी, या प्लान्टमध्ये कंपनीच्या २,००० ते २,४०० गाड्या बनवण्याचे काम सुरू होते. परंतु, आता कंपनीने हे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लान्ट पुढचा महिनाभर बंद राहणार आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी मात्र, हा प्लान्ट वार्षिक मेन्टेनन्सच्या कारणास्तव बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, पण मेन्टेनन्ससाठी एवढा कालावधी लागत नसल्याचे ऑटो सेक्टरमधील तज्ज्ञांचे म्हणणेआहे.
‘टाटा’ कंपनीने हा प्लान्ट तब्बल २००० करोड रुपये खर्चुन उभारला आहे. आता, याच प्लान्टमध्ये टाटा मोटर्स आपल्या नव्या ‘काईट’ या कारच्या उत्पादनाची तयारी करत आहे. त्याशिवाय नव्या ‘सेडान’ या गाडीचेही उत्पादन येथे सुरु करण्यात येईल, अशी चिन्ह आहेत.

Leave a Comment